पहूर प्रतिनिधी- (ता. जामनेर)
दिशा लाईव्ह न्यूज -:- राजकीय दृष्ट्या महत्वाच्या पहूर गावात गावकऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध असून, राजकीय समीकरणे तापू लागली आहेत.
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गावात बैठकांचे, चर्चांचे, तसेच प्रचाराच्या रणनीतीचे सत्र रंगू लागले आहे.
“स्व-विकासाचे राजकारण संपले पाहिजे” — जनतेचा रोष!
गेल्या काही वर्षांपासून सत्तेच्या खुर्चीवर बसून केवळ स्वतःचा विकास करणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही लोकांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “आता पुरे झालं — विकासाच्या नावाखाली स्वतःच्या घरदाराचं उभारलेलं साम्राज्य आम्हाला नको! नवीन चेहऱ्यांना संधी द्या” असा आवाज जनतेतून उठू लागला आहे.
रखडलेली विकासकामे पुन्हा मार्गी?
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महिन्यांपासून रखडलेली रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, नागरिक यावेळी अधिक जागरूक असून, "कामे फक्त निवडणुकीच्या काळातच सुरू का होतात?" असा सवाल विचारत आहेत.
महिलांसाठी राखीव जागा – राजकीय गणितात उलथापालथ!
या निवडणुकीत महिलांसाठी जागा राखीव झाल्यामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या राजकीय समीकरणात उलथापालथ झाली आहे. काही अनुभवी कार्यकर्ते नाराज असून, महिला उमेदवारांच्या शोधात गटबाजी वाढू लागली आहे.
लोहारा-कुऱ्हाड गटात चुरशीच्या लढतींची शक्यता –
लोहारा-कुर्हाड गटासह पहूरमध्येही राजकीय तापमान वाढले!
राजकीय विश्लेषकांच्या मते, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. सत्ताधारी आपला गड टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर विरोधक नव्या उमेदवारांसह जनतेच्या असंतोषावर भांडवल करण्यास सज्ज आहेत.
“यावेळी जनता विकासाच्या मुद्द्यावर निर्णय घेईल”
पहूरमधील मतदार आता पारदर्शकता, जनसंपर्क आणि प्रामाणिक कामगिरी या तीन मुद्द्यांवर उमेदवारांची चाचपणी करत आहेत. "ज्यांनी स्वतःचा नव्हे तर गावाचा विकास केला, त्यांनाच संधी मिळाली पाहिजे" — अशा जनतेच्या विचारांमुळे आगामी निवडणुकीत नवे राजकीय चेहरे उदयास येण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments