Type Here to Get Search Results !

पाळधी येथे भीषण अपघात : भरधाव चारचाकी चहाच्या टपरीत घुसली; एकाचा मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा पाच तास रास्ता रोको; राष्ट्रीय महामार्ग ठप्प




पहूर प्रतिनिधी--ता. जामनेर :

 दिशा लाईव्ह न्यूज --::-- जामनेर तालुक्यातील पाळधी येथील महाराणा प्रतापसिंह चौफुलीवर आज सकाळी सुमारे १०.३० वाजता भीषण अपघात घडला. जळगावहून संभाजीनगरकडे जाणारी भरधाव चारचाकी (MH 20 DV 8315) चालकाला वेग नियंत्रित करता न आल्याने थेट चहाच्या टपरीत घुसली. या धडकेत टपरीसमोर उभ्या असलेल्या नागरिकांना गाडीने चिरडले.


या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी उत्तम भीमसिंग परदेशी (वय ४६) यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत--उत्तम भीमसिंग परदेशी

              वारंवार अपघातांचे सत्र सुरूच...

विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका ट्रकने दुकानात घुसून मोठा अपघात घडवला होता. त्यावेळी सुदैवाने जीवितहानी टळली होती. मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

                 संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको



घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी जळगाव–संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

           ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :


तात्काळ स्पीड ब्रेकर बसविणे.


दोन्ही बाजूंना इशारा फलक (बोर्ड) लावणे.


चौफुलीवरील अतिक्रमण तात्काळ हटविणे.


“जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार,” असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.



                    -प्रशासनाची दखल

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


या ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यांतील नागरिक, शेतकरी, तसेच शाळकरी विद्यार्थी महामार्ग ओलांडून ये-जा करतात. त्यामुळे येथे नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते व अपघाताचा धोका कायम असतो. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



                     पोलिसांचा चोख बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पहूर पोलीस स्टेशनचे एपीआय प्रमोद कठोरे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली.


या दुर्दैवी घटनेमुळे पाळधी परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाने ठोस आणि तातडीची उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments