Type Here to Get Search Results !

लोहारा व बांबरुड राणी परिसरात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती; वन विभागाचे पाणवठे ठरले शोपीस.व्याकुळ जनावर घेताय पाण्याचा शोध.



दिशा लाईव्ह न्यूज-:-– यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे बांबरुड राणी परिसरातील वन्यजीवांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तहानेने व्याकुळ झालेले वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगल सोडून गावाच्या हद्दीत येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वन विभागाने उभारलेले पाणवठे कोरडे पडल्याने ते केवळ नावापुरतेच उरले असून या प्रकारामुळे पशुप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानाने जवळपास 44 डिग्रीचा आकडा पार केल्याने जंगलातील नाले, ओढे, तळी आणि इतर नैसर्गिक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. परिणामी हरीण, ससे, कोल्हे तसेच इतर लहान-मोठे वन्यप्राणी जीव वाचवण्यासाठी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत आहेत. अनेक वेळा हे प्राणी शेती क्षेत्रात किंवा मानवी वस्तीत आल्याने त्यांना अपघात, कुत्र्यांचे हल्ले किंवा इतर धोके निर्माण होत असून गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



वन विभागाकडून वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या पाणवठ्यांमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने ते पूर्णपणे निष्प्रभ ठरत आहेत. अनेक पाणवठे गाळाने भरलेले असून काही ठिकाणी पाण्याचा पुरवठा करण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ वन्यप्राण्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जंगलातील झाडांची पाने गळून पडली असून सावलीचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे वन्यजीवांना विश्रांतीसाठी योग्य जागा मिळत नसल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करताना हे प्राणी मानवी संपर्कात येत असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढली आहे.

स्थानिक नागरिक, शेतकरी व पशुप्रेमी यांनी वन विभागाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पाणवठ्यांमध्ये नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच नवीन तात्पुरते जलसाठे निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या संकटावर दीर्घकालीन उपाय म्हणून जलसंवर्धनाच्या प्रभावी योजना राबवणे, जंगलात पाणीसाठे वाढवणे आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात या भागातील वन्यजीवांच्या अस्तित्वावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आता धारेवर धरले पाहिजे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे, जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाणवठे नाही, राखीव जंगल सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून वनविभागाच्या सिमा रेषेवर चारी खोदणे गरजेचे आहे म्हणजे जंगलात कोणी घुसणार नाही व जंगली प्राणी जंगलाच्या बाहेर येऊन शेत मालाचे नुकसान करणार नाही तसेच जाळ रेषा तयार करणे गरजेचे आहे.अशी सुज्ञ नागरिक व शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

मात्र.. वनविभागाकडून कोणत्याही कामाची सुरुवात केलेली नाही, ही कामे फक्त आणि फक्त कागदोपत्री दाखवून खर्च टाकला जातो. असेही सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments