दिशा लाईव्ह न्यूज --::--मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. “हॉटेल ग्रामपंचायत”च्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेने कुटुंब, नातेवाईक आणि
परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रोहिणी या अत्यंत हसतमुख, कष्टाळू आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. पती निलेश पाराध्ये यांच्या सोबत त्यांनी संसाराची गाडी प्रेमाने आणि जिद्दीने पुढे नेली. दोघेही सोशल मीडियावर आपल्या साध्या, मनमिळाऊ स्वभावामुळे आणि खाद्यपदार्थांवरील रील्समुळे लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्हिडिओंमधून दिसणारे प्रेम, आपुलकी आणि एकमेकांबद्दलचा आदर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत होता.
याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत” सुरू केले. दिवस-रात्र कष्ट करून उभा केलेला हा व्यवसाय हळूहळू स्थिरावत होता. नव्या शाखेचे स्वप्नही दोघांनी एकत्र पाहिले होते. मात्र, नियतीने हा आनंदाचा प्रवास अचानक थांबवला.
काल दुपारी साडेदोनच्या सुमारास हॉटेलच्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. तातडीने त्यांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला.
एका तरुण, स्वप्नाळू आणि कुटुंबासाठी झटणाऱ्या स्त्रीने असा टोकाचा निर्णय का घेतला, हा प्रश्न सर्वांच्या मनाला चटका लावत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
रोहिणी यांच्या जाण्याने केवळ एक कुटुंब नव्हे, तर एक उभं राहत असलेलं स्वप्नच तुटलं आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचं हसू आणि त्यांनी निर्माण केलेलं प्रेम कायम सर्वांच्या मनात जिवंत राहील.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, त्यांच्या मृत्यूमागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Post a Comment
0 Comments