दिशा लाईव्ह न्यूज -:- (दिनेश चौधरी, लोहारा)--- : अंगणात पोळ्याची लगबग सुरू होती... बैलांना सजविण्याची तयारी सुरू होती... घराघरांत उत्साहाचे वातावरण होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण आनंदात साजरा करण्याची तयारी चौधरी कुटुंबाने केली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच तब्बल २५ वर्षे कुटुंबाची साथ देणाऱ्या ‘राजा’ बैलाने अखेरचा श्वास घेतला आणि चौधरी कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले.
राजा हा केवळ बैल नव्हता; तो चौधरी कुटुंबातील एक सदस्यच झाला होता. तब्बल पंचवीस वर्षांचा सहवास, शेतीच्या कामातील साथ, सुख-दुःखाच्या असंख्य प्रसंगांचा साक्षीदार असलेला हा मुका जीव अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. २५ वर्षे जपलेले नाते आणि असंख्य आठवणी एका क्षणात विरून गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती.
वडिलोपार्जित गुरे सांभाळण्याची परंपरा....
लोहारा येथील चौधरी कुटुंबाला शेतीसोबतच पशुपालनाचीही जुनी परंपरा आहे. वडिलोपार्जित गुरे सांभाळण्याची आवड आणि गाई, बैल, म्हशी यांच्यावरील अतोनात प्रेम आजही या कुटुंबात जपले जाते. रामभाऊ चौधरी, अमृतभाऊ चौधरी, युवराजभाऊ चौधरी आणि संदीपभाऊ चौधरी हे कुटुंबातील सदस्य अत्यंत कष्टाने शेतीसोबत पशुसंवर्धनाची जबाबदारी सांभाळतात.
गुरे म्हणजे केवळ जनावरे नव्हेत, तर घरातील सदस्यच आहेत, या भावनेने त्यांची देखभाल केली जाते. त्यांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. त्यामुळेच चौधरी कुटुंब आणि त्यांच्या गुरांमध्ये एक वेगळेच भावनिक नाते निर्माण झाले आहे.
२५ वर्षांपूर्वी घरात आला अन् कुटुंबाचा ‘राजा’ झाला..
सुमारे २५ वर्षांपूर्वी बैलपोळ्याच्या काळात चौधरी कुटुंबात आलेल्या या बैलाला प्रेमाने ‘राजा’ असे नाव देण्यात आले. त्यानंतर राजा कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला. शेतीच्या कामात त्याने तब्बल दोन दशके कुटुंबाला साथ दिली. कष्ट, पाऊस, ऊन, चिखल आणि शेतीच्या प्रत्येक हंगामात राजा कुटुंबासोबत राहिला.
त्याला केवळ शेतीचे जनावर म्हणून न पाहता, माणसासारखीच माया आणि आपुलकी देण्यात आली. त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे राजाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.
पोळ्याच्या तीन वर्षांपासून ‘फोडण्याचा मान’ राजाला.....
गेल्या तीन वर्षांपासून पोळ्याच्या दिवशी पोळा फोडण्याचा मान राजाला मिळत होता. पोळ्याच्या दिवशी त्याला विशेष सजवले जायचे. अंगावर रंगीबेरंगी सजावट, शिंगांना रंग, गळ्यात घुंगरू आणि प्रेमाने खाऊ घालण्यात येणारा गोड घास—या सगळ्यामुळे चौधरी कुटुंबासाठी पोळा म्हणजे राजाचा सणच झाला होता.
दरवर्षी पोळ्याच्या दिवशी राजा दिमाखात उभा राहायचा आणि त्याच्याकडे पाहून कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा. यंदाही तशीच तयारी होती; मात्र पोळ्याच्या आदल्या दिवशीच त्याने अखेरचा श्वास घेतल्याने हा आनंद अचानक अश्रूंमध्ये बदलला.
आजारपणातही कुटुंबाने केली शेवटपर्यंत सेवा....
काही दिवसांपूर्वी राजा गुरे चारण्यासाठी सोडण्यात आला असताना दगड-गोट्यांचा अंदाज न आल्याने तो नाल्यात कोसळला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेतही तो सायंकाळी चालत घरी आला. मात्र, दुखापत गंभीर असल्याने कुटुंबीयांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले.
कुटुंबातील तब्बल ३२ सदस्य गुरांची देखभाल एकत्रितपणे करतात. राजाच्या आजारपणातही त्याची मनापासून सेवा करण्यात आली. त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीयांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र पोळ्याच्या पूर्वसंध्येला दुपारी चार वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
आज पोळा... पण चौधरी कुटुंबात दुःख!!.....
आज सर्वत्र बैलपोळ्याचा उत्साह आहे. बैलांना सजवले जात आहे, त्यांची पूजा केली जात आहे, गोडधोड खाऊ घातले जात आहे. मात्र चौधरी कुटुंबासाठी यंदाचा पोळा कायम स्मरणात राहणारा आणि डोळ्यांत पाणी आणणारा ठरणार आहे.
रामभाऊ चौधरी, अमृतभाऊ चौधरी, युवराजभाऊ चौधरी, संदीपभाऊ चौधरी, दीपक चौधरी, भारत चौधरी तसेच कुटुंबातील महिला सदस्य यशोदाबाई आणि सरलाबाई यांच्यासह संपूर्ण चौधरी कुटुंबाला राजाच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.
दरवर्षी राजाला सजवून, त्याची पूजा करून, त्याला गोड घास भरवून पोळा साजरा करणारे कुटुंबीय यंदा त्याच आठवणींमध्ये रमले आहेत. अंगणात पोळ्याचा उत्सव असला तरी राजाची उणीव प्रत्येक क्षणी जाणवत आहे.
मुक्या जीवावरील प्रेमाचा आदर्श.
चौधरी कुटुंबाची कथा केवळ एका बैलाच्या मृत्यूची नाही, तर माणूस आणि मुक्या जीवामधील २५ वर्षांच्या नात्याची आहे. पशुधनाला केवळ आर्थिक साधन न मानता त्यांच्याशी प्रेमाचे नाते जोडता येते, हे या कुटुंबाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
राजाने २५ वर्षे दिलेली साथ, शेतीतील त्याचे कष्ट, पोळ्याच्या दिवशीचा त्याचा दिमाख आणि कुटुंबीयांनी त्याच्यावर केलेली माया—या सगळ्या आठवणी आता चौधरी कुटुंबाच्या मनात कायमच्या जिवंत राहणार आहेत.
पोळा आजही साजरा होईल... बैल सजतील... पूजा होईल... गोड घास भरवला जाईल; पण चौधरी कुटुंबाच्या अंगणात ‘राजा’ची जागा मात्र यापुढे कायम रिकामीच राहणार आहे.
२५ वर्षांचा सहवास संपला असला, तरी राजाने कमावलेले प्रेम आणि त्याच्या आठवणी चौधरी कुटुंबासाठी आयुष्यभराची शिदोरी ठरणार आहेत.
Post a Comment
0 Comments