दिशा लाईव्ह न्यूज -:- जळगांव तालुक्यातील कुसुंबा येथे पुन्हा दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये लोहारा, ता. पाचोरा येथील भाजी विक्रेता महिला ठार झाली आहे.तर दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सविस्तर वृत्त असे की, लोहारा येथील अत्यंत गरीब व मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवणाऱ्या भाजीपाला विक्रेता यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
रत्नाबाई गणेश हिवाळे (माळी) वय ४०, रा.लोहारा ता. पाचोरा असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती व मुलासह लोहारा गावात भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती.
आज मंगळवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लोहारा येथून रत्नाबाई हिवाळे ह्या जळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी घेण्यासाठी लोहारा येथील बापू भास्कर चौधरी यांच्या रिक्षा मधून येत होत्या.
कुसुंबा गावाजवळ रिक्षा आली असताना विराज ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसने त्यांच्या रिक्षाला जबर धडक दिली. त्यात रिक्षा पलटी झाली. यामध्ये रत्नाबाई हिवाळे या बाहेर फेकल्या जाऊन दिशादर्शक फलकाच्या खांब्याला त्यांचे डोके आदळल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.
तर रिक्षा चालक बापू भास्कर चौधरी आणि रिक्षातील आणखी एक जण गणेश बाबुलाल जाधव (वय २८ रा. रोटवद तांडा ता. जामनेर) हे जखमी झाले.
दरम्यान पोलिसांना घटना घडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मयत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
लोहारा,ता.पाचोरा येथिल ग्रामस्थांनी घटना घडताच जळगाव येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती.
कै. रत्नाबाई हिवाळे यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. तर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.
Post a Comment
0 Comments