दिशा लाईव्ह न्यूज -:- पहूर (ता. जामनेर) –
"एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये" या उद्देशाने शिक्षण विभागाकडून १ जुलै ते १५ जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पहूर केंद्रात मोठ्या उत्साहाने आणि कटाक्षाने काम करण्यात आले.
पहूर केंद्राचे केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे पार पडली. शाळेबाह्य बालकांची माहिती संकलित करण्यासाठी शिक्षकांनी गावातील वाड्या, वस्त्या, तांडे, वस्ती क्षेत्रे पिंजून काढली.
या सर्वेक्षणामध्ये शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधला, मुलांच्या शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण केली आणि शाळेत न आलेल्या मुलांच्या नोंदी घेतल्या. शाळेपासून दूरावलेल्या आणि शिक्षण हुकलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा उपक्रम सर्वसमावेशक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला असून, शिक्षकांनी दाखवलेली तळमळ व सामाजिक भान कौतुकास्पद आहे.
या अभियानामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणखी काही मुले जोडली जातील, असा विश्वास केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांनी व्यक्त केला आहे.
"पहूर हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने अनेक वेळा येथे स्थलांतरित कुटुंब येतात .त्यामध्ये शाळाबाह्य बालके ही आढळून येतात . वेळोवेळी त्यांना जवळच्या शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला जातो . "
शंकर रंगनाथ भामेरे ,
बालरक्षक चळवळ कार्यकर्ते
Post a Comment
0 Comments