दिशा लाईव्ह न्यूज--::--महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच जळगाव जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
प्रेमात अडथळा आणि लग्नाचा तगादा या कारणावरून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जंगलात नेऊन अत्यंत निर्घृणपणे संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणीच्या प्रेमात हा तरुण वेडा झाला होता, ती तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर हे प्रकरण हत्येपर्यंत पोहोचले. या घटनेने जळगाव शहर आणि परिसर हादरून गेला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील (वय २१, रा. पहूर,ता.जामनेर ) हा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी नाशिक येथे वास्तव्यास होता. तिथेच एका पाणीपुरीच्या स्टॉलवर त्याची ओळख आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे (मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. सुरत) हिच्याशी झाली.
या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते, चॅटिंगद्वारे संवाद साधत होते. मात्र, काही दिवसांनी स्वप्नीलला धक्कादायक माहिती मिळाली की, ज्या आकांक्षावर तो प्रेम करत आहे, ती मुलगी नसून तृतीयपंथी आहे. हे सत्य समजताच त्याने तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि संपर्क कमी केला.
दुसरीकडे, आकांक्षा मात्र स्वप्नीलच्या प्रेमात आकंठ बुडाली होती आणि ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी अडून बसली होती. तिने स्वप्नीलचा पाठलाग सुरूच ठेवला, इतकेच नव्हे तर ती त्याच्या गावी पहूर येथेही पोहोचली. स्वप्नीलच्या कुटुंबीयांनीही त्याला समजावले, परंतु आकांक्षा काहीही ऐकण्यास तयार नव्हती. तिने स्वप्नीलला, "तू दुसऱ्या मुलीशी लग्न कर, पण माझ्याशीही तुला लग्न करावे लागेल," असा आग्रह धरला. तिच्या या सततच्या त्रासाला आणि हट्टाला कंटाळून स्वप्नीलने शेवटी तिचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
या कटानुसार, ३१ जानेवारी रोजी आकांक्षा सुरतवरून जळगावला आली. स्वप्नील आणि आकांक्षा दुचाकीवरून पद्मालय येथे गेले. वाटेत त्यांनी वाईन शॉपमधून बियरच्या बाटल्या घेतल्या. पद्मालय येथे पोहोचल्यानंतर दोघांनी गणपतीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते जवळच असलेल्या घनदाट जंगलात गेले.
तिथे स्वप्नीलने तिला पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न केला की तो तिच्याशी लग्न करू शकत नाही. मात्र, आकांक्षाने त्याचे ऐकले नाही. यावरून दोघांमध्ये वाद आणि झटापट झाली. संतापलेल्या स्वप्नीलने खाली पडलेल्या आकांक्षाचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर, आपली ओळख मिटवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने दुचाकीतून पेट्रोल काढले, ते मृतदेहावर ओतले आणि मृतदेह पेटवून देऊन तेथून पोबारा केला.
सुमारे चार दिवसांनंतर, ४ फेब्रुवारीला पद्मालय वनक्षेत्रात हा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहरा आणि छातीचा भाग जळालेला असल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्या जंगलात नेटवर्कही नव्हते. मात्र, तपास पथकाने बारकाईने पाहणी केली असता, मृतदेहाच्या पायाच्या नखांवर मॅजेंटा रंगाची नेलपॉलिश आणि नाकात सोन्याची मुरणी आढळून आली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारीच्या दरम्यान झाल्याचे स्पष्ट केले.
याच धाग्यांच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी आरोपी स्वप्नील पाटीलचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या. खाकीचा धाक दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Post a Comment
0 Comments